Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 01 December 2020 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – ०१ डिसेंबर २०२० सकाळी ७.१० मि ****
· मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यात आज पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी मतदान.
· पदवीधर मतदारांनी मतदानाचा हक्क योग्य पद्धतीनं बजवावा - निवडणूक विभागाचं आवाहन.
· राज्यातल्या सर्व जिल्ह्यात आजपासून क्षयरुग्ण आणि कुष्ठरुग्ण शोध अभियान.
· बीएचआर पथसंस्था घोटाळ्याची व्याप्ती ११०० कोटी रुपये - माजी मंत्री एकनाथ खडसे.
· ज्येष्ठ रंगकर्मी, राम जाधव यांचं काल अकोला इथं दीर्घ आजारानं निधन.
· राज्यात काल तीन हजार ८३७ नवीन कोविड रुग्ण; मराठवाड्यात नव्या ३१६ रुग्णांची नोंद.
आणि
· परभणी जिल्ह्यात चंदनाची तस्करी करणाऱ्या टोळीला अटक.
****
मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यात आज पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या रिंगणात ३५ उमेदवार असून, विभागातले एकूण ३ लाख ७३ हजार १६६ पदवीधर मतदार, ८१३ मतदान केंद्रांवर मतदानाचा हक्क बजावतील. औरंगाबाद जिल्ह्यात १ लाख ६३ हजार ७९ मतदारांसाठी, २०६ मतदान केंद्रं उभारण्यात आली आहेत. जालना जिल्ह्यात २९ हजार ७६५ मतदारांसाठी ७४ मतदान केंद्र, परभणी- ३२ हजार ७१५ मतदारांसाठी ७८ केंद्रं, हिंगोली- १६ हजार ७९४ मतदारांसाठी ३९ केंद्रं, नांदेड- ४९ हजार २८५ मतदारांसाठी १२३ केंद्रं, बीड - ६३ हजार ४३६ मतदारांसाठी १३१ केंद्रं, लातूर - ४१ हजार १९० मतदारांसाठी ८८ केंद्रं, तर उस्मानाबाद जिल्ह्यातल्या ३३ हजार ६३२ मतदारांसाठी, ७४ मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत. या सर्व मतदान केंद्रांवर मतपत्रिका, मतपेट्या आणि सर्व आवश्यक साहित्यासह मतदान केंद्र पथकं काल रवाना झाली. कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर या सर्व मतदान केंद्रांचं निर्जंतुकीकरण करण्यात आलं असून, इतरही सर्व खबरदारी घेण्यात येत आहे. सकाळी आठ ते सायंकाळी पाच यावेळेत मतदान होणार असून, कोविड बाधित मतदारांना शेवटच्या दोन तासांत मतदान करता येणार आहे.
जालना जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक तयारी पूर्ण करण्यात आली असून, मतदान केंद्रावर आवश्यक खबरदारी घेण्याचे निर्देश, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी मतदान केंद्र अधिकाऱ्यांना दिले आहेत.
परभणी जिल्ह्यात पदवीधर मतदारसंघ निवडणूकीसाठी मतदान होणाऱ्या ठिकाणचे आठवडी बाजार रद्द करण्याचे आदेश, जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिले आहेत.
दरम्यान, पदवीधर मतदारांनी या निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क योग्य पद्धतीनं बजवावा असं आवाहन करत, निवडणूक विभागाकडून मतदानासंबंधी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. मतदानासाठी मतपत्रिकेसोबत पुरवलेल्या जांभळया रंगाच्या स्केच पेनचाच वापर करावा, आपली पहिली पसंत असलेल्या उमेदवाराच्या नावासमोर असलेल्या रकान्यात “१” हा अंक लिहावा, उर्वरित उमेदवारांच्या नावासमोर आपल्या पसंती क्रमानुसार २, ३, ४, इत्यादी अंक लिहिणं ऐच्छिक असल्याचं, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. मतपत्रिकेवर इतर काहीही लिहू नये किंवा खुणा करू नयेत, अशी सूचनाही करण्यात आली आहे.
पदवीधर मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून आज कर्मचाऱ्यांना नैमित्तिक रजा मंजूर करावी, अशी सूचना विभागीय आयुक्त कार्यालयातील उपआयुक्त तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केली आहे. ��ासगी आस्थापनांनाही मतदारांना मतदानापुरती कामातून सवलत देण्यास सांगण्यात आलं आहे. मतदारांची ओळख पटवण्यासाठी मतदार ओळखपत्रासह, आधार कार्ड, वाहन चालक परवाना, पॅन कार्ड, पारपत्र, शासकीय किंवा खासगी आस्थापनांनी दिलेलं ओळखपत्र, शिक्षण संस्थेत कार्यरत शिक्षक मतदारांना दिलेलं ओळखपत्र, पदवी किंवा पदविका मूळ प्रमाणपत्र, सक्षम प्राधिकरणाद्वारे वितरीत अपंगत्वाचं मूळ प्रमाणपत्र, इत्यादी कागदपत्रं पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येतील, असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे.
या मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी विभागात एकूण ९३७ सूक्ष्म निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे.
राज्यात पुणे आणि नागपूर पदवीधर मतदार संघ तसंच पुणे आणि अमरावती शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. या पाचही मतदार संघात तीन डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.
****
राज्यात आजपासून सर्व जिल्हा तसंच महानगरपालिका क्षेत्रात “संयुक्त सक्रिय क्षयरुग्ण आणि कुष्ठरुग्ण शोध अभियान” राबवलं जाणार आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली. महिनाभराच्या या अभियानात राज्यात सुमारे ८ कोटी ६६ लाख २५ हजार २३० लोकांचं सर्वेक्षण करण्यात येणार आहे. सर्व जिल्ह्यांचे पालकमंत्री, महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष, सरपंच यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात ही मोहीम यशस्वी करावी, असं आवाहन आरोग्यमंत्री टोपे यांनी केलं आहे.
पोलिओ लसीकरण मोहिमेच्या धर्तीवर ही मोहिम राबवण्यात येणार आहे, या सर्वेक्षण पथकात दोन सदस्य असतील त्यात आशा स्वयंसेविका, आरोग्य सेवक यांचा समावेश असेल. घरी येणाऱ्या पथकास नागरिकांनी तपासणीसाठी सहकार्य करण्याचं आवाहन आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केलं आहे.
****
कोविड प्रादुर्भावाच्या सद्यस्थितीसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या चार तारखेला सर्व राजकीय पक्षांची बैठक घेणार आहेत. राज्यसभा आणि लोकसभेचे सदस्यही या बैठकीत सहभागी होणार असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
दरम्यान, कोविड 19ची लस विकसित करणाऱ्या तीन संशोधक संस्थांच्या चमूसोबत पंतप्रधानांनी काल दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे चर्चा करून, संशोधनाचा आढावा घेतला. पुण्यातली जीनोव्हा बायोफार्मा, आणि हैदराबाद इथली बायोलॉजिकल ई तसंच डॉ. रेड्डी या संस्थांचा यात समावेश होता.
****
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने कोरोना विषाणू संसर्गाविषयी जनजागृती मोहीम सुरु केली आहे. कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी मास्क लावणं, वारंवार हात धुणं आणि एकमेकात सुरक्षित सामाजिक अंतर राखण्याचं आवाहन कृषी पर्यटनाचे प्रणेते चंद्रशेखर भडसावळे यांनी केलं आहे.
****
जळगाव इथल्या भाईचंद हिराचंद रायसोनी - बीएचआर पतसंस्थेच्या घोटाळ्याची व्याप्ती तब्बल ११०० कोटी रुपयांची असून, पतसंस्थेच्या मालमत्ता बड्या मंडळींनी मातीमोल भावात विकत घेतल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे, ते काल जळगाव इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. आपण याबाबत २०१८ मध्ये तक्रार केली होती, त्यावेळी हे प्रकरण पध्दतशीरपणे दडपून टाकण्यात आल्याचं खडसे यांनी सांगितलं. याप्रकरणी दिल्लीहून चौकशीचे दिलेले निर्देश सुध्दा पाळण्यात आले नसल्याचं खडसे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकानं काल जळगाव इथं एका कार्यालयावर टाकलेल्या छाप्यात काही कागदपत्रं हस्तगत केली, यामध्ये १००पेक्षा जास्त व्यक्तींच्या नावाचे एटीएम कार्ड, काही करारांची कागदपत्रं आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या नावाचं लेटरपॅडचा समावेश असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
मुख्यमंत्र्यांनी किमान राज्यातल्या जनतेच्या प्रश्नासाठी तरी बाहेर पडावं, असं माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी म्हटलं आहे. ते काल तुळजापूर इथं तुळजाभवानी देवीच्या दर्शनानंतर बोलत होते. महाविकास आघाडी सरकारच्या वर्षभराच्या कामकाजावर टीका करत, या सरकारला सदबुद्धी देण्याचं साकडं आई तुळजाभवानीला घातल्याचं निलंगेकर म्हणाले.
दरम्यान, राज्य सरकार मागील वर्षभरात सर्वच बाबतीत अपयशी ठरल्याची टीका, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष खासदार प्रीतम मुंडे यांनी केली आहे. त्या काल जालना इथं वार्ताहर परिषदेत बोलत होत्या. महाविकास आघाडी सरकारची वर्षपूर्ती ही जनतेची निराशापूर्ती असल्याचं त्या म्हणाल्या.
****
ज्येष्ठ रंगकर्मी, राम जाधव यांचं काल अकोला इथं दीर्घ आजारानं निधन झालं. ते ८७ वर्षांचे होते. रंगभूमीवर अभिनया सोबतच, दिग्दर्शन, निर्माता म्हणूनही आपली छाप पाडलेल्या जाधव यांना, राज्यशासनासह विविध संस्थांनी अनेक पुरस्कार देऊन गौरवलं होतं. २०११ मध्ये रत्नागिरी इथं भरलेल्या ९१ व्या नाट्यसंमेलनाचं अध्यक्षपद राम जाधव यांनी भुषवलं होतं. त्यांच्या निधनानं नाट्यक्षेत्रासह सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे. जाधव यांच्या निधनानं नाट्यक्षेत्रामध्ये मोठी पोकळी निर���माण झाल्याची शोकभावना, सां��्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी व्यक्त केली आहे.
****
महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.शीतल आमटे यांचं काल सकाळी निधन झालं, चंद्रपूर जिल्ह्यात आनंदवन इथं त्यांनी आत्महत्या केल्याचं काल सकाळी निदर्शनास आलं. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आमटे यांच्या नात, तर डॉ विकास आमटे यांच्या कन्या असलेल्या डॉ.शीतल यांना, ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’ने मार्च २०१६ मध्ये, ‘यंग ग्लोबल लीडर’ या पुरस्कारनं गौरवलं होतं. मात्र गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावात होत्या, त्यातच त्यांनी आनंदवनातले कार्यकर्ते तसंच आमटे कुटुंबातल्या सदस्यांवर गंभीर आरोप केले होते. मात्र आमटे कुटुंबातल्या सर्व ज्येष्ठ सदस्यांनी एक संयुक्त निवेदन जारी करून, हे आरोप तथ्यहीन असल्याचं स्पष्ट केलं होतं. दरम्यान, डॉ.शीतल यांच्या पार्थिव देहावर काल सायंकाळी आनंदवनात अंत्यसंस्कार करण्यात आले.
****
राज्यात काल तीन हजार ८३७ नवीन कोविड बाधित रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या १८ लाख २३ हजार ८९६ झाली आहे. राज्यभरात काल ८० रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या विषाणू संसर्गामुळे होणाऱ्या मृत्यूचा दर २ पूर्णांक ५९ शतांश टक्के झाला आहे. तर काल चार हजार १९६ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत १६ लाख ८५ हजार १२२ रुग्ण, कोरोना विषाणू मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९२ पूर्णांक ३९ शतांश टक्के एवढा झाला आहे. सध्या राज्यात ९० हजार ५५७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
मराठवाड्यात काल ९ कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्या ३१६ रुग्णांची नोंद झाली.
जालना, परभणी तसंच उस्मानाबाद जिल्ह्यात काल प्रत्येकी दोन कोविडग्रस्तांचा तर औरंगाबाद जिल्ह्यात तीन कोविडग्रस्तांचा मृत्यू झाला.
औरंगाबाद ७८, जालना ६८, बीड ४५, लातूर ३९, परभणी ३०, नांदेड २८, उस्मानाबाद २२, तर हिंगोली जिल्ह्यात काल सहा रुग्ण आढळले
****
शीख धर्माचे संस्थापक गुरु नानकदेव यांची जयंती काल सर्वत्र भक्तिभावानं साजरी झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुनानक यांच्या कार्याचं स्मरण करून त्यांना अभिवादन केलं.
गुरुनानक जयंतीनिमित्त ठिकठिकाणच्या गुरुद्वारांमध्ये कोविड प्रतिबंधाचे नियम पाळून विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले. जालना इथं सार्वजनिक मिरवणूक न काढता शीख बांधवांनी सामाजिक उपक्रम राबवल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
संत एकनाथ महाराजांनी लिहिलेल्या एकनाथी भागवत ग्रंथाला काल ३० नोव्हेंबरला ४४७ वर्ष पूर्ण झाली. यानिमित्त काल पैठण इथं एकनाथ महाराजांच्या समाधी मंदिरात भागवत या ग्रंथाची पूजा करण्यात आली. कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर हा उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. एकनाथी भागवत हा ग्रंथ महाराष्ट्रातल्या अनेक गावातून नियमितपणे वाचला जातो.
****
त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त काल लातूर इथं पापविनाश भुतेश्वर मंदिरात दीपोत्सव साजरा करण्यात आला. फुलांची आकर्षक सजावट केलेल्या या मंदिराचा परिसर काल सायंकाळी एक हजार १११ पणत्यांनी उजळून निघाला होता.
****
परभणी जिल्ह्याच्या मानवत तालुक्यात चंदनाची तस्करी करणाऱ्या टोळीला अटक करून त्यांच्या ताब्यातून सुमारे दहा किलो चंदन पोलिसांनी हस्तगत केलं. जिल्हा पोलीस अधीक्षक जयंत मीना यांच्या विशेष पथकानं रामेटाकळी शिवारात सापळा लावून नऊ जणांना अटक केली, त्यांच्या ताब्यातून दहा किलो चंदनासह एक कार, एक मोटरसायकल असा सुमारे तीन लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.
****
मराठवाड्यातल्या युवकांनी कृषीपूरक उद्योग - व्यवसाय उभारावेत, असं आवाहन राज्याचे वैद्यकीय शिक्षण तसंच सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी केलं आहे. लातूर तालुक्यात रायवाडी इथं संगमेश्वर बोमणे यांच्या पुढाकारातून उभारलेल्या, श्रीशैल्य हायटेक नर्सरीचा शुभारंभ काल देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. रोजगार निर्मितीसाठी पुढाकार घेणाऱ्या युवकांना सर्वतोपरी सहकार्याचं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं.
****
नांदेड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष मंगाराणी अंबुलगेकर यांनी नागरिकांना कोविड प्रतिबंधाच्या त्रिसुत्रीचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे.
****
दक्षिण मध्य रेल्वे विभागानं काही गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, यामध्ये सिकंदराबाद - मनमाड- सिकंदराबाद अजंठा एक्सप्रेस आजपासून, नांदेड-मुंबई राज्यराणी विशेष गाडी परवा ३ डिसेंबरपासून, तर सिकंदराबाद-नांदेड-मुंबई देवगिरी विशेष गाडी येत्या ५ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. हैदराबाद-जयपूर-हैदराबाद उत्सव विशेष गाडी, पूर्णा पाटणा पूर्णा उत्सव विशेष गाडी या दोन गाड्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. आदिलाबाद-मुंबई-आदिलाबाद नंदीग्राम विशेष एक्स्प्रेस या गाडीला उद्यापासून मध्ये तीन अधिकचे डबे जोडले जाणार आहेत.
****
0 notes