Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 17 March 2024
Time: 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १७ मार्च २०२४ सकाळी ७.१० मि.
****
लोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर;देशभरात सात टप्प्यात मतदान;चार जूनला मतमोजणी
महाराष्ट्रात १९ एप्रिल ते २० मे पर्यंत पाच टप्प्यात निवडणूक तर मराठवाड्यात २६ एप्रिल, सात मे आणि १३ मे रोजी मतदान
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा मुंबईत समारोप
नांदेड जिल्ह्यात गारपिटीसह अवकाळी पाऊस;वीज पडून एकाचा मृत्यू
आणि
मराठवाडा साहित्य परिषदेचा नटवर्य लोटू पाटील विशेष नाट्यपुरस्कार मुंबईचे नाट्यकर्मी राजीव नाईक यांना जाहीर
****
लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, देशभरात सात टप्प्यात निवडणूक होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांनी काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पहिल्या टप्प्यात १९ एप्रिलला लोकसभेच्या एकशे दोन जागांसाठी मतदान होणार असून, २६ एप्रिल रोजी ८९ जागांसाठी, सात मे रोजी ९४, १३ मे रोजी ९६, २० मे रोजी ४९, २५ मे रोजी ५७ तर एक जून रोजी ५७ जागांसाठी मतदान होईल. मतमोजणी चार जून रोजी होणार आहे.
महाराष्ट्रात पाच टप्प्यात तर मराठवाड्यात तीन टप्प्यात मतदान होणार आहे. पहिला टप्प्यात १९ एप्रिल रोजी रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, आणि चंद्रपूर इथं मतदान होणार असून, दुसऱ्या टप्प्यात २६ एप्रिलला बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड, आणि परभणी इथं मतदान होईल. तिसऱ्या टप्प्यात ७ मे रोजी रायगड, बारामती, धाराशिव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, आणि हातकणंगले इथं मतदान होणार असून, चौथा टप्प्यात १३ मे रोजी नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, आणि बीड इथं मतदान होईल. पाचव्या टप्प्यात २० मे रोजी धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, आणि मुंबईतल्या सहा मतदारसंघात मतदान होणार आहे.
निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच, देशभरात आचारसंहिता लागू झाली आहे.
दरम्यान, निवडणूक आयुक्तांनी देशभरातल्या मतदारांचा तसंच मतदानासाठीच्या विविध सुविधांचा यावेळी आढावा घेतला. देशभरात एकूण ९७ कोटी मतदार असून, त्यापैकी एक कोटी ८२ लाख नवमतदार आहेत. या मतदारांना देशभरातल्या साडे दहा लाख मतदान केंद्रांवर मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. ८५ वर्षांपेक्षा अधिक वयाचे मतदार तसंच दिव्यांग मतदारांना आपल्या घरून मतदान करण्याची सुविधा उपलब्ध असणार आहे.
राजकीय पक्षांसाठी नियमावली आयोगानं जाहीर केली. निवडणूक प्रचारात आदर्श आचारसंहितेचं पालन सर्वांना करावं लागणार असून, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीला पक्षाने उमेदवारी का दिली, याचा खुलासा करावा लागणार आहे. प्रचारादरम्यान सर्वांनी मर्यादेचं भान राखावं, असं आवाहनही आयुक्तांनी केलं. मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रलोभनांच्या वाटपावर तपास यंत्रणांना काटेकोर नजर ठेवण्यास सांगण्यात आलं आहे. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांसंदर��भातले सगळे आक्षेप निवडणूक आयुक्तांनी खोडून काढत, मतदान यंत्र तसंच व्हीव्हीपॅट यंत्र व्यवस्थित काम करत असल्याचा पुनरुच्चार केला.
दरम्यान, सिक्कीम, ओडिशा, आंध्रप्रदेश, आणि अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीचीही आयोगानं काल घोषणा केली. महाराष्ट्रातल्या अकोला पश्चिमसह अनेक राज्यातल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकाही आयोगाने जाहीर केल्या. संबंधित मतदार संघात लोकसभेच्या मतदानासोबतच विधानसभेचं तसंच पोटनिवडणुकीसाठीचं मतदान होणार आहे.
दरम्यान निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेनंतर काल सर्वच जिल्ह्यांत जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन संबंधित जिल्ह्यातला निवडणूक कार्यक्रमाची सविस्तर माहिती दिली.
****
मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेत सगेसोयरे तरतुदीवर आलेल्या हरकतींची छाननी करुन ४ महिन्यात अंतिम निर्णय घेणार असल्याचं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं आहे. राज्य मंत्रिमंडळाची या आठवड्यातील तिसरी बैठक काल मुख्यंमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली झाली त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. कालच्या बैठकीत सरकारी मालमत्ता विद्रूपीकरणासाठी एक वर्ष कारावास आणि दंडाच्या रकमेत वाढ, संगणकीय न्याय सहाय्यक विज्ञान उत्कृष्टता केंद्र उभारणं, पोलीस दलात कृत्रीम बुद्धिमत्तेचा वापर, आणि हाताने मैला उचलण्याच्या प्रथेच्या उच्चाटनासाठी रोबोटिक स्वच्छता यंत्रं वापराच्या योजनेला मान्यतेसह अनेक निर्णय घेण्यात आली.
दरम्यान, सगे-सोयरे कायद्याची अंमलबजावणी करावी तसंच मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. ते काल जालना जिल्ह्याच्या अंतरवाली सराटी इथं पत्रकार परिषदेत बोलत होते.
****
दिव्यांगाना स्वावलंबी बनविण्यासाठी मोबाईल शॉप ऑन व्हेईकल अंतर्गत पर्यावरणस्नेही वाहनं उपलब्ध करून देण्याच्या योजनेचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते काल मुंबईत शुभारंभ करण्यात आला. चार दिव्यांग व्यक्तिंना हरित उर्जेवर चालणार्या पर्यावरणस्नेही फिरत्या दुकानांच्या चाव्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आल्या.
****
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा काल मुंबईत समारोप झाला. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी देखील या यात्रेत सहभागी झाल्या. दादर इथं चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादनानंतर या यात्रेचा समारोप झाला. आज रविवारी मणीभवन ते ऑगस्ट क्रांती मैदान अशी ही न्याय संकल्प पदयात्रा काढण्यात येणार आहे. आज सायंकाळी शिवाजी पार्कवर जाहीर सभेलाही राहुल गांधी संबोधित करणार आहेत.
दरम्यान, काँग्रेस पक्षाचे जनसंपर्क प्रभारी जयराम रमेश यांनी काल मुंबईत पत्रकार परिषद घेतली. निवडणूक रोख्यांच्या मुद्यावरून त्यांनी भारतीय जनता पक्षावर कडाडून टीका केली.
****
प्रसार भारतीचे अध्यक्ष म्हणून नवनीत कुमार सेहगल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काल त्यांनी या पदाचा कार्यभार स्वीकारला.
****
नांदेड जिल्ह्यात काल सायंकाळी नायगाव तालुक्यात गारांचा अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे रबी पिकांना मोठा फटका बसला. काढणीला आलेला गहू भिजल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. ज्वारी करडई आदी पिकांचंही नुकसान झालं आहे. कंधार तालुक्याच्या येलुर इथं वीस वर्षीय युवकाचा वीज अंगावर पडून मृत्यू झाला. तर, अन्य एका घटनेत नायगाव तालुक्याच्या रातोळी इथं वीज पडल्यानं वृद्ध पती-पत्नी गंभीर जखमी झाले.
विदर्भात नागपूर शहरात काल गारपिटीसह मुसळधार पाऊस झाला. नागपूर, भंडारा तसंच गोंदिया इथं आज अतिवृष्टीचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यात हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रीय झाल्याचं, हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे.
****
मराठवाडा साहित्य परिषदेचा नटवर्य लोटू पाटील विशेष नाट्यपुरस्कार मुंबईचे नाट्यकर्मी आणि दिग्दर्शक राजीव नाईक यांना जाहीर झाला आहे. तर यशवंतराव चव्हाण विशेष वाङ्गमय पुरस्कार पर्यावरण शास्त्रज्ञ डॉ.माधव गाडगीळ यांना जाहीर झाला आहे. अकरा हजार रुपये रोख, शाल, श्रीफळ असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. मसापच्या वतीनं जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात ही माहिती देण्यात आली.
****
ज्येष्ठ साहित्यिक दिवंगत नरहर कुरुंदकर यांच्या नांदेड इथं उभारल्या जाणाऱ्या स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्याच्या बांधकामासाठी राज्य सरकारनं १४ कोटी ७८ लाख रूपये मंजूर केले आहेत. याबाबतचा शासननिर्णय काल जारी करण्यात आला.
****
धाराशिव इथं काल पोलिस अधिक्षक कार्यालयात जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत आढावा बैठक झाली. पारधी बांधवांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी धाराशिव जिल्ह्यात राबवलेला पहाट उपक्रम छत्रपती संभाजीनगर विभागांतर्गत चारही जिल्ह्यांत राबवणार असल्याचं, विशेष पोलिस महानिरीक्षक, विरेंद्र मिश्रा यांनी सांगितलं.
****
हिंगोली-मुंबई जनशताब्दी एक्सप्रेसचं आरक्षित तिकीट हिंगोली इथं पहाटे सव्वा चार वाजेपर्यंत देण्याचा निर्णय दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने घेतला आहे. सामान्य वेळेत सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेनंतर हिंगोली रेल्वेस्थानकावरच्या फलाट क्रमांक दोन वरील तिकीट खिडकीतून मध्यरात्री १२ वाजेपासून ते पहाटे सव्वा चार वाजेपर्यंत या गाडीचं आरक्षित तिकीट प्रवाशांना घेत येणार आहे.
****
स्वीप उपक्रमाअंतर्गत मतदार जाणीव जागृतीसाठी छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी जिल्ह्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांची काल बैठक घेतली. या लोकशाहीच्या उत्सवात मतदानाच्या माध्यमातून सहभागी व्हावे आणि लोकशाही अधिक मजबूत करण्यासाठी आपलं योगदान द्यावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
****
बीड जिल्ह्यातील लोकसभा निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया शांतता तसंच निर्भय वातावरणात पार पडावी, यासाठी जिल्ह्यात कसल्याही प्रकारचे जात, भाषा, धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनांवर निर्बंध घालण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी दिली आहे.
****
परभणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवरील गट "क" संवर्गातील तलाठी पदावर ८१ उमेदवारांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी हे नियुक्ती आदेश निर्गमित केले.
****
0 notes